मृतदेह मोजण्याचे काम शूरवीरांचे नाही तर गिधाडांचे : राजनाथ सिंहांचा काँग्रेसवर वार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/rajnath-singh-696x435.jpg)
हरिद्वार : भाजपचे जेष्ठनेते तथा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज उत्तराखंड येथील हरिद्वार येथे एका जाहीर सभेमध्ये बोलताना पाकिस्तानातील बालाकोट हवाई हल्ल्यामध्ये मारलेल्या दहशतवाद्यांची आकडेवारी जाहीर करावी अशी मागणी करणाऱ्या काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर चांगलाच निशाणा साधला. यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, “काँग्रेसचे नेते बालाकोट हवाई हल्ल्यामध्ये किती दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असा प्रश्न विचारत आहेत मात्र मला सांगा शूरवीर कधी मृतदेह मोजत बसतात का? मृतदेह मोजण्याचे काम शूरवीरांचे नसून ते गिधाडांचे आहे.”
दरम्यान, भारतातील पुलवामा येथे पाकिस्तानपुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरएफच्या ताफ्यावर भ्याड हल्ला चढवला होता. या दहशतवादी कारवाईला प्रतिउत्तर देताना भारतातर्फे पाकिस्तानातील बालाकोट येथील जैशच्या दहशतवादी प्रशिक्षण तळावर हल्ला चढविण्यात आला होता. मात्र भारताने बालाकोट येथे केलेल्या दहशतवादी कारवाईच्या यशाबाबत विरोधी पक्षांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून या कारवाईमध्ये किती दहशतवादी मारले गेले याची आकडेवारी प्रसिद्ध करावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.