मुस्लीम महिलेने उर्दूत लिहिले रामायण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/writes-ramayana-in-urdu.jpg)
कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूरमधील एका मुस्लीम महिलेनं उर्दू भाषेत रामायण लिहून सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याचे आदर्श उदाहरण देशासमोर ठेवले आहे. मुस्लीम समाजालाही रामायणातील चांगल्या गोष्टींबद्दल माहिती व्हावं, हा त्यामागील उद्देश असल्याचे तिने सांगितले.
डॉ. माही तलत सिद्दीकी असे या महिलेचे नाव असून, त्या कानपूरच्या प्रेमनगरमध्ये राहतात. त्यांना दोन वर्षांपूर्वी कानपूरमधील बद्री नारायण तिवारी यांनी रामायणाची आवृत्ती भेट म्हणून दिली. ते वाचल्यानंतर हे महाकाव्य उर्दू भाषेत लिहावं असा निर्धार त्यांनी केला. रामायणातून शांती आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला असून, ते उर्दूत लिहिल्यानंतर मी तणावमुक्ती आणि शांतता अनुभवत आहे, असेही त्यांनी सांगितले
रामायण उर्दू भाषेत लिहिण्यासाठी दीड वर्षाहून अधिक कालावधी लागला. हिंदी भाषेतील रामायणातील भावार्थ बदलू नये, याकडे विशेष लक्ष द्यावं लागलं. समाजात काही लोक धार्मिक मुद्द्यांवर चिथावणी देऊन हिंसा पसरवण्याचं काम करतात. पण कोणताही धर्म द्वेष करण्याची शिकवण देत नाही, असा संदेशही त्यांनी दिला. डॉ. माही यांचं हिंदी साहित्यातून एमएपर्यंतचं शिक्षण झालं आहे. यापुढे लेखणीतून सामाजिक ऐक्य घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.