मुलींच्या विवाहाचं वय बदलणार, मोदींनी दिले संकेत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Second-shaadi-4.jpg)
नवी दिल्ली – देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशात अनेक बदल होऊ घातले आहेत. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक संकेत दिले. त्यापैकी एक म्हणजे मुलींचं विवाहचं किमान वयही आता बदलण्यात येणार आहे. विवाहासाठी किमान वय किती असावं यावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सराकरने एक समिती गठीत केली असल्याची माहिती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला केलेल्या संबोधनात सांगितलं.
आतापर्यंत मुलींचं विवाहाचं वय १८ तर मुलांचं २१ आहे. मात्र, आता मुलींच्या लग्नाचं वय वाढणार असल्याची शक्यता आहे. समितीनं आपला अहवाल सादर केल्यानंतर याबद्दल योग्य तो निर्णय घेतला जाईल, असंही मोदींनी यावेळी स्पष्ट केलं.
वय वाढवण्यामागचा उद्देश काय?
देशात माता मृत्यूदर वाढत असल्याने मुलींचं विवाहाचं वय वाढवण्याचा विचार करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानंही यासंदर्भात केंद्राला निर्देश दिले होते. तसंच, महिलेला आई बनण्याच्या योग्य वयाबद्दल सल्ला देण्यासाठी एक टास्क फोर्स बनवण्यात येईल, असं अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या मागच्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटलं होतं. अर्थ मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टास्क फोर्सच्या रिपोर्टनंतर मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा बदलण्याचे संकेत दिले आहेत.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयानं काळजी व्यक्त करताना, मुलींवर होणारे वैवाहिक बलात्कार रोखण्यासाठी बाल विवाहावर संपूर्णत: रोखणं आवश्यक असल्याची गरज व्यक्त केली होती. विवाहासाठी किमान वयोमर्यादेचा निर्णय घेण्याचं काम सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारवर सोडलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या या संदर्भातील निर्देशानंतर सरकारनं यासंबंधी प्रयत्न सुरू केले होते.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुलगा आणि मुलगी यांच्या विवाहाची वयोमर्यादा एकसमान असेल आणि मुलीला आई बनण्याची कायदेशीर मर्यादा २१ वर्ष निश्चित करण्यात आली तर महिलांची मुलांना जन्म देण्याच्या क्षमतेतील वर्ष आपोआपच कमी होऊ शकेल.