महिलांची विषारी धूरापासून सुटका…
नवी दिल्ली – गरीब घरातील महिलांना गॅस कनेक्शन देणाऱ्या उज्जवला योजनेमुळे देशात मोठा सामाजिक बदल झाला आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या योजनेअंतर्गत एकूण चार कोटी घरांत गॅस कनेक्शन देण्यात आले असून त्यातील 45 ट्क्के लाभार्थी हे दलित आणि अदिवासी आहेत असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
मुन्शी प्रेमचंद यांनी 1933 मध्ये लिहिलेल्या कथेचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आणि स्वयंपाकघर धूरविरहीत बनवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. उज्ज्वला योजनेमुळे अधिक चांगले आरेग्य, विषारी धुरापासून सुटका आणि स्वच्छ ऊर्जेमुळे अनेक फायदे मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे स्वयंपाक करण्याचा वेळ कमी झाल्याने महिलांना अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
उज्ज्वला योजनेअंतर्गत 2014 पासून 4 वर्षात 10 कोटी नव्या एलपीजी जोडण्या जारी करण्यात आल्या आहेत. 1955 ते 2014 या 6 दशकांच्या कालावधीत या जोडण्या 13 कोटी होत्या. देशातल्या 69 टक्के खेड्यांमध्ये आता 100 टक्के एलपीजी जोडण्या देण्यात आल्या असून 81 टक्के खेड्यात 75 टक्क्यांहून अधिक जोडण्या देण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले.