मणिपूरमध्ये भाजपला धक्का; 9 आमदारांची बंडखोरी,तिघे काँग्रेसमध्ये
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/BJP-Manipur-MLA-Congress.jpg)
इम्फाळ : मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला जबरदस्त हादरे बसले आहेत. भाजप समर्थक 6 आमदारांनी बंडखोरी केली, तर भाजपच्या तीन आमदारांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बिरेन सिंह सरकारला राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे.
संगमा यांच्या नेतृत्वातील ‘नॅशनल पीपल्स पार्टी’च्या (एनपीपी) चार आमदारांनी पाठींबा काढून घेतला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री वाय जॉयकुमार सिंग, कॅबिनेट मंत्री एन कायसी, एल जयंत कुमार सिंह आणि लेटपाओ होकीप यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.
सुभाषचंद्र सिंह, टीटी हॉकीप आणि सॅम्युएल जेंदाई या भाजपच्या तीन आमदारांनी पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देऊन विरोधीपक्ष काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
याशिवाय तृणमूल काँग्रेसचे एकमेव आमदार टी. रोबिंद्रो सिंह आणि अपक्ष आमदार शहाबुद्दीन यांनीही भाजपचा पाठिंबा काढून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.