भ्रष्ट उमेदवारांवरून राहुल यांनी पुन्हा घेरले मोदींना
नवी दिल्ली – कर्नाटकात भाजपने खाण भ्रष्टाचार प्रकरणातील दोषी रेड्डी बंधुंसह त्यांच्या टोळीतील एकूण आठ जणांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे असा आरोप करीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले आहे. या संबंधात त्यांनी कर्नाटकातील मोस्ट वॉन्टेड या नावाने एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून मोदींना याचा खुलासाही त्यांनी मागितला आहे. या व्हिडीओ मध्ये भाजपच्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अन्य काही उमेदवार व मंत्र्यांचीही छायाचित्रे आहेत.
या संबंधात राहुल यांनी म्हटले आहे की प्रिय मोदीजी आपण खूप बोलता. पण आपले बोलणे आणि प्रत्यक्ष कृती यांचा कधीच मेळ बसत नाही. कर्नाटकातील तुमच्या उमेदवार निवडीकडेच तुम्ही पहा आणि बोला असे त्यांनी म्हटले आहे. रेड्डी बंधुंच्या गॅंगमधील आठ जणांना भाजपने कशी तिकीटे दिली यावर तुम्ही पाच मिनीटे बोलाल काय? ज्यांच्यावर भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे तब्बल 23 खटले दाखल आहेत असा माणूस तुमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कसा? तुमच्या वरीष्ठ 11 नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांच्या विषयी तुम्ही कधी बोलणार?, असे प्रश्न त्यांनी मोदींना विचारले आहेत. भाजपच्या भ्रष्ट उमेदवारांचे आणि नेत्यांचे फोटोही त्यांनी या व्हिडीओ मध्ये टाकले आहेत.
रेड्डी बंधुंच्या 35 हजार कोटी रूपयांच्या खाणघोटाळ्यावर मोदींनी पडदा टाकला आहे असा आरोपही यात करण्यात आला असून याविषयी मोदींनी उत्तर द्यावे, त्यांच्या उत्तराची आपण वाट पहात आहोत असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.