भिरकवलेल्या दगडांमुळे काश्मीरमध्ये अस्थिरता-नरेंद्र मोदी
श्रीनगर : ‘भरकटलेल्या तरुणांकडून भिरकावण्यात आलेला प्रत्येक दगड आणि शस्त्र देश, जम्मू-काश्मीर अस्थिर करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे संबंधितांना हिंसाचार घडवून आणण्याच्या आणि अस्थिरता निर्माण करण्याच्या मानसिकतेतून बाहेर काढण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
रमझानच्या पवित्र महिन्यात दहशतवादी संघटनांच्या विरोधातील मोहीम रद्द करण्याच्या घोषणेनंतर प्रथमच मोदींचे शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये एकदिवसीय दौऱ्यावर आगमन झाले. ‘काही परकीय शक्ती अद्याप काश्मीरमध्ये कार्यरत असून, या परिसरात कोणतीही विकासकामे होऊ नयेत यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर काश्मीरातील तरुणांनी मुख्य प्रवाहात सामील होऊन देशाच्या विकासात योगदान देण्याची गरज आहे,’ असेदी मोदी यांनी नमूद केले.
काश्मीरचा विकास हेच सर्व समस्यांवरील उत्तर आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून काश्मीरच्या विकासाची धोरणे राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे मी प्रत्येक काश्मिरी नागरिकाला राज्याच्या विकासात सहभागी होण्याचे, आवाहन करीत आहे. प्रत्येक समस्येचे उच्चाटन करण्याची क्षमता केवळ विकास, विकास आणि विकासातच आहे, या शब्दांत मोदी यांनी काश्मिरी जनतेला साद घातली.