भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होणं अशक्य – इम्रान खान
गेल्या अनेक काळापासून काश्मीर मुद्द्यावरुन भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरु आहे. काश्मीर मुद्द्यावरुन दोन्ही देशांनी एकमेकांवर अनेकदा टीका केली असून संघर्ष टोकाला गेला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर मुद्द्यावर बोलताना युद्ध हा यावर उपाय नसल्याचं म्हटलं आहे. काश्मीरचा मुद्दा युद्धाने नाही तर चर्चेच्या माध्यमातून सोडवला गेला पाहिजे असं मत इम्रान खान यांनी व्यक्त केलं आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हे मत मांडलं आहे.
जोपर्यंत चर्चा सुरु होत नाही, तोपर्यंत काश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी वेगवेगळ्या उपायांवर चर्चा केली जाऊ शकत नाही. हा मुद्दा सोडवण्यासाठी कोणता फॉर्म्यूला वापरण्यात यावा असं विचारलं असता इम्रान खान यांनी सांगितलं की, यावर दोन ते तीन पर्याय आहेत, ज्यावर चर्चा केली गेली आहे. मात्र यावर अधिक बोलण्यास किंवा माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. यावर आता बोलणं घाईचं ठरेल असं ते म्हणाले आहेत.
पुढे बोलताना त्यांनी भारतासोबत युद्दाची कोणतीही शक्यता नसल्याचं म्हटलं आहे. भारतासोबत युद्ध छेडलं जाण्याची कोणतीही शक्यता नाही. दोन्ही देशांकडे अणुबॉम्ब असून, युद्ध करु शकत नाही. तसं झाल्यास त्याचे परिणाम खूप वाईट होतील. भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान गांभीर्याने वाटचाल करत आहे. पाकिस्तानी सरकार आणि लष्कराची देखील हीच इच्छा आहे असंही ते म्हणाले आहेत.