भारत-चीन संबंधांतून पाकिस्तानने धडा घ्यावा – नवाज शरीफ
इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारत आणि चीन या दोन देशातील संबंध जवळिकीचे होत चालले आहेत. या संबंधातून पाकिस्तानने धडा घ्यावा, असा सल्ला भ्रष्टाचार प्रकरणात अडकलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिला आहे. भारत-चीन जवळ येत आहेत. पण मागील अनुभवांवरून आपण मात्र काही शिकत नाही, असे नवाज शरीफ यांनी म्ह्टले आहे.
मी सत्तेवर असतो तर पाकिस्तानला एका वेगळ्याच उंचीवर नेले असते असा दावा त्यांनी केला. इस्लामाबादमध्ये न्यायालयाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानला प्रगतीपथावर नेण्यासाठी आमच्या सरकारने अनेक योजना सुरू केल्या. आम्ही चांगले करू इच्छित होतो, पण काहींनी आम्हाला ते करू दिले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पनामा पेपर्स प्रकरणात नवाज शरीफ यांचे नाव आल्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र घोषित केले. परिणामी त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. रविवारी लाहोरमधील पीटीआय (पाकिस्तानी तेहरिक पार्टी) च्या रॅलीवर टीका करताना शरीफ यांनी सांगितले, की गेली अनेक वर्षे इम्रान खानच्या पोकळ दाव्यांशिवाय लोकांना काहीही ऐकायला मिळालेले नाही.