भारत-चीन कमांडर पातळीवरची चर्चा तब्बल 11 तासांनी संपली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/india-china.jpg)
लडाख – पूर्व लडाखच्या गलवान, गोग्रा, पेंगोंग येथून चीनने आपले सैन्य मागे घ्यावे म्हणून भारत व चीन यांच्या कमांडर पातळीवरच्या अधिकाऱ्यांची बैठक मॉल्डो येथे 11 तास चालली. रविवारी सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री 10 वाजता संपली. चीनने गलवान येथून आपले सैन्य माघारी घेतले असले तरी पेंगोंग आणि गोग्रा येथे त्यांचे सैन्य अजून रेंगाळत आहे. ते सर्व सैन्य मागे घेऊन 5 मे पूर्वी होते त्या ठिकाणी न्यावे, अशी स्पष्ट मागणी भारताने केली आहे.
रविवारच्या या कमांडर पातळीवरच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्त्व लेह येथे मुख्यालय असलेल्या 14 कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह यांनी केले तर चीनचे नेतृत्त्व दक्षिण शिंझियांग परिक्षेत्राचे कमांडर मेजर जनरल लियू लिन यांनी केले. यापूर्वी या दोन कमांडर पातळीवरच्या प्रतिनिधी मंडळांची बैठक 14 जुलैला तब्बल 15 तास चालली होती. 15/16 जूनच्या रात्री पेंगोंग त्सो येथे भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली होती. त्यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचेही 40हून अधिक जवान मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे.
दरम्यान, भारतीय सैन्याने येत्या हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या पूर्व लडाखच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी पुरेशा सैन्याची जमवाजमव केली आहे. त्याचप्रमाणे सैनिकांसाठी छावण्या आणि बंकर याचीही तयारी सुरू केली आहे. तसेच युद्धसाहित्य आणि सैन्याला लागणारे अन्नधान्य यांचाही साठा केला जात आहे.