भारताचे पहिले हिंदकेसरी पै. श्रीपती खंचनाळे यांच्या उपचाराची जबाबदारी सतेज पाटील यांनी उचलली!
कोल्हापूर । प्रतिनिधी
भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांची तब्येत खालावल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली असून कोल्हापूरमधील एका खासगी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सतेज पाटील यांनी ट्विट करत त्यांच्या तब्येतीची माहिती दिली असून उद्या रुग्णालयामध्ये ते स्वतः त्यांची भेट घेणार आहेत.
श्रीपती खंचनाळे हे भारताचे पहिले हिंदकेसरी ‘किताब जिंकणारे मल्ल आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात त्यांना वस्ताद नावाने ओळखले जात असून कोल्हापूरमधील अनेक पहिलवानांना त्यांनी आपल्या तालमीत प्रशिक्षण दिले आहे. सतेज पाटील यांनी त्यांच्या तब्येतीची माहिती देण्याबरोबरच त्यांच्या संपूर्ण उपचाराच्या खर्चाची जबाबदारी देखील पाटील यांनी घेतली आहे. श्रीपती खंचनाळे यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उंच पातळीवर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्या या कठीण काळात त्याच्या उपचाराची जबाबदारी पाटील यांनी घेतली आहे. संपूर्ण भारतातील कुस्तीगीरांसाठी प्रेरणा आणि आदर्श असणारे श्रीपती खंचनाळेजी लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना पाटील यांनी केली.
दरम्यान, खंचनाळे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा येथील आहेत. त्यांनी १९५९ ला पंजाब केसरी बनाता सिंग याला पराभूत करत हिंदकेसरी गदा मिळवून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. त्यानंतर त्याच वर्षी त्यांनी कराड येथे आनंद शिरगावकर यांना दोन मिनिटांत अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्याचबरोबर अनेक ऑल इंडिया चॅम्पियनशिप स्पर्धा देखील जिंकल्या आहेत. आपल्या कामगिरीमुळे त्यांना अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न, एकलव्य पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, महाराष्ट्र भूषण यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.