बिहार विधानसभा निवडणुका स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली – कोरोना महामारी आणि राज्यातील भीषण पूरस्थिती या पार्श्वभूमीवर येत्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणाऱ्या बिहारच्या विधानसभा निवडणुका स्थगित कराव्यात, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. बिहारमध्ये निवडणुका घेण्याची अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केलेली नाही. त्यामुळे निवडणुकांना स्थगिती देणे हे योग्य नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. दाखल केलेली याचिका ही अपरिपक्व असल्याचे मतही सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एम.आर. शाह यांच्या खंडपीठाने अविनाश ठाकूर यांनी केलेली ही ही निवडणूक स्थगित करण्याची याचिका फेटाळून लावली.
कोरोना महामारी मुळे निवडणूक स्थगित करणे हे योग्य कारण नाही. कलम 32 अंतर्गत दाखल केलेली याचिका अत्यंत चुकीची आहे. त्यावर आम्ही विचार करू शकत नाही, असे न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी सांगितले. तर न्यायमूर्ती एम.आर. शाह यांनी याचिकाकर्ते अविनाश ठाकूर यांना फटकारताना सांगितले की, निवडणूक आयोग निवडणूक घेताना सर्व गोष्टींची काळजी घेणार आहे. तुम्हाला असे का वाटते की निवडणूक आयोग सर्व गोष्टींचा विचारच करत नाही म्हणून?
गेल्या 24 तासात बिहार मध्ये 1,860 नवे कोरणा ग्रस्त रुग्ण सापडले आहेत. बिहार मधील कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या 1,28,850 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 9 रुग्णांनी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये
18,491 ॲक्टिव रूग्ण आहेत.