प्रदूषणाबाबत चार राज्यांच्या सचिवांना समन्स
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/l-6-2.jpg)
- दिल्लीतील प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाकडून विचारणा
दिल्ली राजधानी परिसरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या हे जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली, पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेश या राज्यांच्या मुख्य सचिवांना उपस्थित राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. न्या. अरूण मिश्रा, न्या. दीपक गुप्ता यांनी सांगितले की, दिल्लीतील तेरा प्रमुख ठिकाणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.
सम-विषम वाहनांच्या योजनेत दुचाकी व तीन चाकी वाहनांना सूट देण्याच्या दिल्ली सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सम-विषम वाहनांची योजना राबवूनही प्रदूषण वाढतच चालले असल्याबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. पिकांचे अवशेष जाळण्याचे प्रमाण कमी होत असतानाही प्रदूषण वाढतच आहे असे न्यायालयाने म्हटले आहे.
दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, सम-विषम वागन योजनेमुळे प्रदूषण कमी झाले आहे. शेजारील राज्यांमध्ये भाताच्या पिकाचे अवशेष जाळण्यात येतात, त्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. प्रदूषणास कारण ठरणारे काळसर धुके कमी करण्यासाठी मनोरे उभारण्याची शक्यता तपासून पाहिली जात आहे.