प्रज्ञा ठाकूर यांची उमेदवारी रद्द करा, त्या समाजात रहाण्यायोग्य नाहीत-शीला दीक्षित
प्रज्ञा ठाकूर यांची उमेदवारी रद्द करा, त्या समाजात रहाण्यायोग्य नाहीत असं दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी म्हटलं आहे. नथुराम गोडसे हा दहशतवादी नाही तर देशभक्त होता असं वक्तव्य साध्वी प्रज्ञा यांनी केलं होतं. इतकंच नाही तर जे कोणी नथुराम गोडसेला दहशतवादी म्हणतात त्यांना धडा शिकवू असंही त्या म्हटल्या होत्या. साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. काँग्रेससह सगळ्याच प्रमुख विरोधी पक्षांनी साध्वी प्रज्ञांवर टीकेचे ताशेरे ओढले होते. अखेर पक्षानेही त्यांना झापले ज्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी त्यांची आणि पक्षाची भूमिका वेगळी नसल्याचे सांगत वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली.
अभिनेते कमल हासन यांनी नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता अशी टीका केली होती. याबाबत जेव्हा साध्वी प्रज्ञा यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी नथुराम गोडसे देशभक्त होता आहे आणि राहिल असं म्हटलं होतं. यावरून बराच वादंग झाला. भाजपानेही ते साध्वी प्रज्ञा यांचं मत असल्याचं म्हटलं आणि या वक्तव्याबाबत त्यांना झापलं. एवढंच काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही साध्वी प्रज्ञा यांना या वक्तव्यासाठी कधीच माफ करणार नसल्याचं म्हटलं. ज्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र साध्वी प्रज्ञा यांच्याबाबत होणारी टीका काही थांबताना दिसत नाही. साध्वी प्रज्ञा समाजात रहाण्यायोग्य नाहीत त्यांची उमेदवारी भाजपाने रद्द केली पाहिजे अशी टीका आता दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी केली आहे.