पाकिस्तान बरोबर चर्चा नाहीच – सुषमा स्वराज
नवी दिल्ली – पाकिस्तान जो पर्यंत दहशतवादाला मदत करण्याचे धोरण सोडत नाही तो पर्यंत त्या देशाशी चर्चा करायची नाहीं ही आमची भूमिका कायम आहे. पाकिस्तानबरोबरच्या संबंधात आम्ही मवाळ धोरण स्वीकारलेले नाही अशी भूमिका परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी मांडली आहे.
मोदी सरकारला चार वर्ष पुर्ण झाल्याच्या निमीत्ताने घेतलेल्या वार्षिक पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.भारत आणि पाकिस्तान यांच्यात सागरी सुरक्षेच्या संबंधातील चर्चा आज दिल्लीत होत आहे, त्यावरून भारताने आता पाकिस्तानबाबत मवाळ धोरण स्वीकारले आहे काय असे विचारता त्या म्हणाल्या की ट्रॅक टु वरील चर्चा दोन्ही देशांमध्ये होत असतात पण मागील काही वेळा आम्ही अशा चर्चाही रद्द केल्या आहेत.
कुलभुषण जाधव यांच्या विषयावरून दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर आम्ही तसा निर्णय घेतला होता. पण या महिन्यापासून ट्रॅक टु पातळीवरील चर्चा पुन्हा सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. तथापी आमच्या मुलभूत धोरणात बदल झालेला नाही. आजही सीमेवर मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. त्यात आमचे जवान शहींद होत आहेत अशा वातावरणात आम्ही त्यांच्याशी चर्चा करू इच्छित नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकने इराणवर निर्बंध घातले आहेत त्या विषयी भारताची भूमिका काय असे विचारता त्या म्हणाल्या की आम्ही फक्त संयुक्तराष्ट्रांनी घातलेले निर्बंधच स्वीकारतो. अन्य त्रयस्थ देशांनी घेतलेले अशा प्रकारचे निर्णय आमच्यावर बंधनकारक नाहीत. अमेरिकेन व्हिसा निर्बंध अधिक कडक केले आहे त्या विषयी विचारता त्या म्हणाल्या की या विषयावर आम्ही अमेरिकेच्या विविध विभागांशी संपर्क साधून आहोत. त्यांच्या या निर्णयाचा कोणत्याही भारतीय नागरीकावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.