पाकची आडमुठी भूमिका, भाविकांना गुरुद्वाराचं घ्यावं लागतंय दुर्बिणीतून दर्शन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/kartarpur-sahib.jpg)
भारत-पाकिस्तान सीमारेषेवर नेहमीच तणाव असतो. पण पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर थोडे वेगळे चित्र आहे. येथे सीमेवर बीएसएफने एक दर्शन स्थळ उभारले आहे. या दर्शन स्थळावर दररोज देशभरातून मोठया संख्येने शीख भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. बीएसएफने उभारलेल्या या दर्शन स्थळावर एक दुर्बिण ठेवण्यात आली असून शीख भाविक या दुर्बिणीतून समोर पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या करतारपूर साहिब या गुरुद्वाराच्या कळसाचे दर्शन घेत आहेत.
रवी नदीच्या पलीकडे पाकिस्तानच्या नारोवाल जिल्ह्यात हा गुरुद्वारा आहे. सीमारेषेपासून ४.५ किलोमीटर आत पाकिस्तानमध्ये हे गुरुद्वारा आहे. या गुरुद्वारामध्ये गुरु नानक यांनी वास्तव्य केले होते. त्यामुळे जगभरातल्या शीख धर्मियांसाठी हे अत्यंत पवित्र तीर्थस्थळ आहे. मागच्या महिन्यात पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीच्या सोहळयासाठी पाकिस्तानला गेले होते. त्यावेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी पुढच्यावर्षी गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त डेरा बाबा नानक ते करतारपूर साहिब गुरुद्वारापर्यंतचा मार्ग खुला करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानंतरच इथे दर्शनासाठी गर्दी वाढू लागली आहे. मागच्या आठवडयात पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद अहमद चौधरी म्हणाले कि, इम्रान खान सरकार भारतातील शीख बांधवांना करतारपूर साहिब येथे व्हिसा मुक्त प्रवेश देण्यावर विचार करत आहे. सध्या शीख भाविक भारतातूनच दर्शन स्थळावरुन दुर्बिणीच्या सहाय्याने करतारपूर साहिब गुरुद्वाराच्या कळसाच्या दर्शनावर समाधान मानत आहेत.
शिखांच्या इतिहासानुसार १५२२ साली गुरु नानक करतारपूर साहिब येथे स्थायिक झाले. त्या जागेवर नंतर गुरुद्वारा बांधण्यात आला. प्रत्येक शीख दररोज प्रार्थना करताना नानकाना साहिब आणि पाकिस्तानातील अन्य गुरुद्वारामध्ये कुठल्याही अडथळयाशिवाय प्रवेश मिळावा अशी प्रार्थना करत असतो. आमची इच्छा लवकरच पूर्ण होईल असे वाटते असे बलजिंदर कौर यांनी सांगितले.