पश्चिम त्रिपुराला वादळाचा तडाखा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/cyclone-1.jpg)
शेकडो घरांचे नुकसान, वृक्ष उन्मळून पडले, वीजपुरवठाही खंडित
आगरतळा : पश्चिम त्रिपुराला बुधवारी रात्री सोसाटय़ाच्या वाऱ्यासह आलेल्या वादळाचा जोरदार तडाखा बसला, त्यामध्ये शेकडो घरांचे नुकसान झाले असून अनेक वृक्ष उन्मळून पडले आणि विजेचा पुरवठाही खंडित झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वादळाच्या या तडाख्यात एकूण ३८२ घरांचे नुकसान झाले आणि आगरतळा महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी पाणीही तुंबले. राज्याचे मुख्य सचिव एल. के. गुप्ता यांनी ज्येष्ठ अधिकाऱ्यांसह स्थितीचा आढावा घेतला आणि तुंबलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखण्याचे आदेश दिले.
विजेच्या खांबांवर वृक्ष उन्मळून पडल्याने खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. सरकारचे स्थितीवर बारकाईने लक्ष असून मुख्यमंत्री विप्लव देव यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य त्या सूचना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. राज्यात बुधवारी सरासरी १९.९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली, पुढील महिन्यात पाऊस येईपर्यंत सोसाटय़ाचा वारा आणि वादळाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.