‘पक्षाने मला माझी जागा दाखवली’, राहुल गांधींच्या रॅलीत न बोलावल्याने भडकले नवज्योत सिंग सिद्धू
पंजाबमधील मोगा येथे गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रॅलीत नवज्योत सिंग सिद्धू यांना न बोलावण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. नाराज झालेल्या सिद्ध यांनी सांगितलं की, याआधी 2004 मध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्या रॅलीत आपल्याला बोलण्यापासून थांबवण्यात आलं होतं. त्यावेळी सिद्धू भाजपात होते आणि अमृतसरमधून खासदार होते.
सिद्धू यांनी सांगितलं आहे की, ‘राहुल गांधींच्या सभेत बोलण्यासाठी मी योग्य व्यक्ती आहे की नाही याची कल्पना नाही. मी एक चांगला वक्ता किंवा पक्ष प्रचारक म्हणून योग्य आहे की नाही हेदेखील माहित नाही. मला बोलावणं माझ्या हातात नाही. पण या सगळ्यांवरुन एक गोष्ट स्पष्ट आहे की पक्षाने मला माझी जागा दाखवली आहे. यासोबतच आगामी लोकसभा निवडणुकीत कोण पक्षाचा प्रचार करणार आहे हेदेखील स्पष्ट झालं आहे’.
पंजाबचे काँग्रेस अध्यक्ष सुनील जाखड यांनी सिद्धू यांना रॅलीत सहभागी करुन घ्यायला हवं होतं असं मत व्यक्त केलं आहे. ते एक उत्तम वक्ता असून पक्षाचे स्टार प्रचारक आहेत असंही ते म्हणाले आहेत. राहुल गांधींनी मला सगळ्यांचं भाषण झालं आहे का असं विचारलं होतं, पण मी त्यांच्यासोबतच आलो असल्याने याची कल्पना नव्हती.
या रॅलीचं आयोजन राज्यातील मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी केलं होतं. त्यांनी सांगितलं आहे की, आपल्याला मुख्यमंत्री अमरिंदर आणि काँग्रेस महासचिव आशा कुमार यांनी चार जणांची नावं देण्यास सांगितलं. राहुल गांधी यांनी कांगडा येथे दुसऱ्या रॅलीसाठी जायचं असल्याने फक्त चारच लोक भाषण करतील असं सांगण्यात आलं होतं. जर मला माहिती असतं की सिद्धू यांनाही बोलवायचं आहे तर नक्की बोलावलं असतं.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानसोबत चर्चा करण्याचं वक्तव्य केल्याने पक्षासमोर अडचण निर्माण झाली होती. हल्ल्यासाठी पाकिस्तान जबाबदार नसल्याचंही ते म्हणाले होते. यामुळे कदाचित पक्ष जाणुनबुजून त्यांचापासून अंतर ठेवत असावं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.