पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले जनतेचे आभार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/modi-4-619x420-2.jpg)
नवी दिल्ली : केंद्रात सत्तेत येऊन मोदी सरकारला आज चार वर्ष पूर्ण झाली आहेत. जनतेनं आमच्या सरकारवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांना विनम्र अभिवादन. तुमचा हा विश्वासच आम्हाला बळ देतो, प्रेरणा देतो. त्याच जोरावर आम्ही यापुढेही जनतेच्या सेवेसाठी स्वतःला झोकून देऊ, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून व्यक्त केल्या आहेत.
नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार येऊन आज बरोबर चार वर्ष पूर्ण झाली आहेत. आपल्या सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून जनतेचे आभार मानले आहेत. “चार वर्षांपूर्वी भारतात बदल घडवण्याच्या उद्देशाने आम्ही प्रवासाला सुरुवात केली. या चार वर्षांमध्ये विकासाला एका चळवळीचे रूप प्राप्त झाले. भारताच्या या विकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचं मोलाचं योगदान आहे. सरकारवर विश्वास दाखवणाऱ्या जनतेसमोर मी नतमस्तक होतो”, असं पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.