न्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेची खंत नाही: निवृत्त सरन्यायाधीश कुरियन जोसेफ
सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावरुन देशात मोठा गहजब माजला होता. या पत्रकार परिषदेत सहभागी झालेले सेवानिवृत्त न्या. कुरियन जोसेफ हेही सहभागी झाले होते. दरम्यान, सेवानि़वृत्तीनंतर न्या. जोसेफ यांनी या पत्रकार परिषदेबाबत कुठलीच खंत नसल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषदेशिवाय आमच्याकडे कोणता पर्याय शिल्लक नव्हता, असे ते म्हणाले. न्या. जोसेफ यांच्याबरोबर आणखी चार न्यायाधीशही या पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते. तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यकाळात न्या. लोया यांच्यासह अनेक संवेदनशील प्रकरणांवरुन ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. खटल्यांचे वाटप करण्याच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाच्या या न्यायमुर्तींनी प्रश्न उपस्थित केले होते.
सरन्याधीशांच्या कार्यप्रणालीवर सवाल उपस्थित करण्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. ते म्हणाले, मला याची कोणतीच खंत वाटत नाही. पत्रकार परिषदेनंतर सर्व काही ठीक झाले का, असेही त्यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, अजून सर्व काही ठीक झालेले नाही. त्याला वेळ लागेल. परंतु, पारदर्शकतेला सुरुवात झाली आहे. आमच्याकडे पर्याय नव्हता. संस्थेच्या हितासाठी हे आम्ही केले. ते ‘नवभारत टाइम्स’शी बोलत होते.तत्पूर्वी, आपल्या निरोप समारंभात बोलताना त्यांनी न्यायाधीशांना सल्लाही दिला. महत्वपूर्ण सामाजिक-राजकीय प्रकरणांवर निर्णय देताना देशाची विविधता लक्षात घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. भारत विविधता असलेला देश आहे. येथील संस्कृती, धर्म, भाषेत विविधता आहे. हा देश संविधानाला बांधील आहे. हे संविधान आम्हा सर्वांना एकजूट ठेवते.