धाक्कादायक! पंचवटी पोलीस ठाण्यासमोर पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू
नाशिक | महाईन्यूज
महिनाभरापुर्वीच मुलीचा विवाह लावून दिला; मात्र अवघ्या आठवडाभरात मुलीने सासर सोडले आणि माहेरीदेखील येण्यास नकार देत मैत्रिणीच्या घरात राहणे पसंत केले, म्हणून तिच्याकडून लेखी जबाब लिहून घेण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यात आलेल्या संधु कुटुंबातील मुलीच्या आईने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली होती. जिल्हा शासकिय रुग्णालयात मंगळवारी (दि.११) हरजिंदरकौर अमरीतसिंग संधु (४६,रा. उमिया अपार्टमेंट, टकलेनगर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
छत्तीसगड येथील रायपूरमध्ये मुलीचा विवाह झाला; मात्र सासरच्या लोकांकडून त्रास होत असल्याचे सांगून मुलीने घर सोडले. याप्रकरणी मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद तेथील स्थानिक पोलिस ठाण्यात सासरच्या लोकांकडून करण्यात आली होती. माहेर नाशिकचे असल्याने मुलगी नाशिकला आल्याचे पालकांनी सासरी कळविले. यानंतर तिच्या वडिलांनी पंचवटी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्या मुलीला समक्ष बोलावून घेत तिच्याकडून तीचा निर्णय लेखी स्वरूपात लिहून घ्यावा, अशी मागणी केली. यावेळी मुलीच्या कुटुंबातील सर्वच नातेवाईक उपस्थित होते. विवाहिता मुलगी तिच्या मैत्रिणीसह पोलीस ठाण्यात आली. यावेळी तिने तीची ताठर भूमिका कायम ठेवत ‘मी माझी सक्षम आहे, मला सासरी,माहेरी जायचे नाही, मी माझ्या जबाबदारीवर हा निर्णय घेत असल्याचे विवाहिता अमनप्रित संधू हिने लेखी दिले. त्यामुळे आलेल्या नैराश्यापोटी रागाच्या भरात तिच्या आई हरजिंदरकौर यांनी त्यांच्या अॅक्टिवा दुचाकीच्या डिक्कीतून पेट्रोलची बाटली काढून स्वत:च्या शरीरावर पेट्रोल टाकून घेत पेटवून घेत आत्महत्त्या करण्याच्या प्रयत्न केला. दरम्यान, त्या यामुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिक भाजल्याने प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रूग्णालयात सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.