देशद्रोहाचा कायदा कठोर करणार : राजनाथ
शिमला : भाजप सत्तेवर आल्यानंतर देशद्रोहाचा कायदा कडक करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी दिली. देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याच्या काँग्रेसच्या आश्वासनावर राजनाथसिंह यांनी सडकून टीका केली. हिमाचल प्रदेशातील राम स्वरूप शर्मा यांच्या कुल्लू जिल्ह्य़ातील प्रचारसभेत ते बोलत होते. भाजप सत्तेवर आल्यास राष्ट्रद्रोही कारवायांना नियंत्रित ठेवण्यासाठी देशद्रोहाच्या कायद्यातील तरतुदी आणखीकठोर करण्यात येतील, असे ते म्हणाले.
भारत कोणत्याही देशाची इंचाएवढी भूमीही ताब्यात घेणार नाही, परंतु कोणत्याही देशाने भारताची भूमी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास कोणतीही किंमत मोजून तो हाणून पाडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
भाजप हा एकमेव असा पक्ष आहे, ज्याचा तळातील कार्यकर्ताही अविश्रांत प्रयत्नांनी मुख्यमंत्रीच नव्हे तर पंतप्रधानही होऊ शकतो. परंतु दुसऱ्या बाजूचा असा एक पक्ष आहे जो फक्त एका कुटुंबाभोवती फिरतो, अशी टीकाही राजनाथ यांनी काँग्रेसचा उल्लेख टाळून केली.
महागाई नियंत्रणात!
भारत ही जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून आंतरराष्ट्रीय नाणे निधीनेही त्याबद्दल कौतुक केल्याचे प्रतिपादन राजनाथ यांनी केले. भाजपच्या सत्ताकाळात महागाई नियंत्रणात राहिल्याचा दावाही त्यांनी केला.