दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्याचा फेसबुकवर राजीनामा
लखनऊ: उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश सहानी यांनी त्यांच्या कार्यालयातच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसांनी एटीएस अधिकाऱ्याने आपला राजीनामा फेसबुकवर पोस्ट केला आहे. या राजीनाम्यासह त्यांनी पोलीस महानिरीक्षक असीम अरुण यांच्यावर मानसिक छळाचा आरोपही केल्याने खळबळ उडाली आहे.
एटीएसचे पोलीस निरीक्षक यतिंद्र शर्मा यांनी पोलीस महासंचालकांना टॅग करून फेसबुकवर राजीनामा पोस्ट केला आहे. ‘एटीएसचे पोलीस महानिरीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार अपमानास्पद वागणूक मिळत असल्यानं सहानी यांनी आत्महत्या केली,’ असा आरोप त्यांनी केला आहे.
यतिंद्र शर्मा यांच्या पोस्टमुळे एटीएसमध्ये खळबळ उडाल्यानंतर काही तासांतच त्यांनी पोस्ट फेसबुकवरून हटवली आणि दुसरी नवीन पोस्ट टाकली. सहानी यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे भावूक होऊन राजीनामा दिला होता, असे स्पष्ट करत शर्मा यांनी वक्तव्यावरून घूमजाव केले. दुसरीकडे शर्मा यांना पोलीस महासंचालकांनी समन्स बजावले. तिथे त्यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सिंघल यांची भेट घेतली.
सूत्रांच्या माहितीनुसार, यतिंद्र यांनी एसटीएफमध्ये बदली मागितली आहे. मला अथवा कुटुंबीयांना कोणताही त्रास किंवा हानी झाली तर त्याला पोलीस महानिरीक्षक जबाबदार असतील, असेही शर्मा म्हणाले. ‘माझ्या मनात होतं ते मी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सगळ्यांसमोर मांडले. डीजीपींच्या मुख्यालयात बदलीचा अर्ज दिला आहे. ज्या ठिकाणी बदली होईल, तेथे रुजू होईल,’ असेही शर्मा यांनी सांगितले.