दलितांच्या घरी जेवल्याने काही होणार नाही- सरसंघचालक
नवी दिल्ली : भाजपाचे नेते दलित समुहातील लोकांच्या घरी जातात, त्यांच्या घरी त्यांच्याबरोबर जेवतात. पण दलित समुहाची उन्नती करण्यासाठी इतकं पुरेसं नाही. नेत्यांनी दलित समुहातील लोकांना स्वतःच्या घरी बोलवायला हवं, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे.
दलित व्यक्तीच्या घरी जाणं पुरेसं नाही. ही पद्धत दोन्ही बाजुंने असावी. ज्या प्रमाणे दलित लोक आपल्याला त्यांच्या घरी बोलावून आपलं स्वागत करतात. त्याचप्रमाणे आपणही आपल्या घरी त्यांचं स्वागत करायला हवं, असं वक्तव्य मोहन भागवत यांनी नुकत्याच झालेल्या संघाच्या एका बैठकीत केलं आहे.
भाजपाच्या काही नेत्यांनी दलित समुहातील लोकांच्या घरी भेट दिली तसंच त्यांच्याबरोबर जेवणं केलं. सामाजिक सलोख्यासाठी भाजपाच्या नेत्यांच्या या भेटी होत्या. अष्टमीच्या दिवशी आपण दलित समुहातील मुलांना घरी बोलावून त्यांची पूजा करतो. पण आपण आपल्या मुलींना त्यांच्या घरी पाठवू का? असा प्रश्नही मोहन भागवत यांनी विचारला.