…त्या विषयाशी आमचा काही संबंध नाही – बांगलादेश
घुसखोरांच्या विषयावरून बांगलादेशाने झटकली जबाबदारी
नवी दिल्ली – आसामच्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स वरून देशभर राजकीय वादंग माजले असतानाच भारतात घुसलेल्या बेकायदेशीर बांगलादेशवासियांविषयीची जबाबदारी बांगलादेशाने झटकली आहे. या विषयाशी आमचा काही संबंध नाही असे त्या देशाचे माहिती मंत्री हसन उल हक इनु यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की गेल्या 48 वर्षात भारताने एकदाही हा विषय बांगलादेश सरकारशी द्विपक्षीय चर्चेत उपस्थित केलेला नाही.
प्रत्येक बांगला भाषिक नागरीकांचा बांगलादेशाशी संबंध जोडणे योग्य नाही. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्सचा विषय आमच्याशी संबंधीत नाही त्यामुळे आम्ही त्यावर काहीही बोलणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
भारतात बेकायदेशीर ठरलेल्या बांगलादेशीयांना आपण आपल्या देशात परत घेणार काय या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. ते म्हणाले की भारताने अजूनपर्यंत आमच्याशी हा विषय उपस्थित केलेला नाही. ते अधिकृतपणे आमच्याशी जेव्हा या विषयावर बोलतील तेव्हा आम्ही वस्तुस्थिती तपासून त्यावर निर्णय घेऊ. आम्हाला आत्ताच त्यावर काहीं बोलता येणार नाही असे ते म्हणाले. प्रत्येक बांगलाभाषिक हा बांगलादेशीच असतो असे मानण्याचे कारण नाही. भारताने नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स विषयी आम्हाला माहिती दिलेली नाही. त्यामुळे आमचा त्या प्रकरणाशी संबंध नाही असे त्यांनी निक्षुन सांगत आपली जबाबदारी झटकली आहे.