‘त्या’ वक्तव्यामुळे आता नवाज शरीफ यांनाच सुरक्षेची गरज -उज्ज्वल निकम
मुंबई : २६/११ च्या हल्ल्यासाठी पाकिस्तानातून अतिरेकी पाठविले गेले होते असे वक्तव्य केलेल्या पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची सुरक्षा वाढवावी लागेल. तसेच हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडावा लागेल अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. नवाज शरीफ यांनी हे वक्तव्य केल्याने त्यांनी पाकिस्तानचे पितळ उघडे पाडले आहे त्यामुळे तिथले लष्कर आणि आयएसआय हे नवाज शरीफ यांना याबाबत जाब विचारतील,असेही निकम म्हणाले.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मुंबई हल्ल्यावर मोठा खुलासा केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, २००८ मध्ये मुंबईमध्ये झालेल्य़ा दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता. याआधी भारताच्या या दाव्यावर पाकिस्तानच्या सरकारने नकार दिला होता. पण आता नवाज शरीफ यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानने आतापर्यंत मुंबई हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका असल्याची गोष्ट नाकारली आहे.