त्या मौलवीला त्वरीत अटक करण्याची जावेद अख्तर यांची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/javed-akhtar-759.jpg)
बंगळुरू – बकरी ईदच्या दिवशी गायींची कत्तल करा अशी सूचना करणाऱ्या मौलवीला त्वरीत अटक केली जावी अशी मागणी प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी केली आहे.मौलवींचे हे विधान बेजबाबदारपणाचे आणि प्रक्षोभक आहे असे अख्तर यांनी म्हटले आहे. सेक्युलॅरिझम म्हणजे अल्पसंख्यांचा जातीयवाद दुर्लक्षित करणे नव्हे असेही त्यांनी बजावले आहे. तन्वीर पीरा हाशीम असे या मौलवीचे नाव आहे. जातीय तणाव निर्माण केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात यावा अशी मागणीही अख्तर यांनी केली आहे.
रमझानच्या प्रार्थनेनिमीत्त उत्तर कर्नाटकातील विजयपुरा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका प्रवचनाच्यावेळी या मौलवीने हे धक्कादायक विधान केले होते. त्यावेळी राज्यातील एक मंत्री शिवानंद पाटील हेही त्यावेळी तेथे उपस्थित होते. कर्नाटकात गोहत्या बंदी कायदा लागू आहे. तरीही त्यांनी असे विधान केल्याने त्यावरून मोठेच वादंग माजले आहे.
तन्वीर हाशिम हे हाशिम पीर दर्ग्याचे प्रमुख आहेत. त्यांनी बकरी ईदच्या दिवशी गायींखेरीज अन्य कोणत्याही प्राण्याची कुर्बानी देऊ नये असे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्या या प्रवचनाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यांच्या या विधानाचा भाजपचे प्रवक्ते एस प्रकाश यांनी निषेध केला आहे. या प्रकरणी संबंधीत मौलवींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.