त्यामुळे पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागितली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/modi-wb_201.jpg)
कोलकाता : शांतिनिकेतनमध्ये विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागितली. यावेळी बंगाली भाषेत मोदींनी भाषणाची सुरुवात केली. ‘मी येथे येत असताना काही विद्यार्थ्यांनी याठिकाणी पाण्याची समस्या असल्याचे मला सांगितले. याबद्दल मी तुमची क्षमा मागतो,’ असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘मी याठिकाणी एक पाहुणा म्हणून नव्हे, तर कुलगुरु म्हणून आलोय. गुरुंकडे गेल्याशिवाय विद्या मिळत नाही, असे आपली संस्कृती सांगते. रविंद्रनाथ टागोर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर इतक्या प्राध्यापकांच्या उपस्थितीत वेळ घालवण्याची संधी मला मिळतेय, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो,’ असं मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी रविंद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधींचा विशेष उल्लेख केला. ‘इथल्या जमिनीला गुरुदेवांच्या पायांचा स्पर्श लाभला आहे. केव्हा तरी त्यांनी याच ठिकाणी त्यांनी महात्मा गांधींसोबत चर्चा केली असेल, असा विचार मी जेव्हा गाडीतून उतरलो, तेव्हा माझ्या मनात येऊन गेला,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी टागोर आणि महात्मा गांधींच्या स्मृतींना उजाळा दिला.
पंतप्रधान मोदींनी यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचाही उल्लेख केला. ‘एका विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला दोन देशांचे पंतप्रधान उपस्थित आहेत, असे बहुधा पहिल्यांदाच घडले असावे. भारत आणि बांगलादेश एकमेकांकडून खूप काही शिकू शकतात,’ असे मोदींनी म्हटले. विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना उपस्थित होत्या. दीक्षांत समारंभानंतर मोदी झारखंडचा दौरा करणार आहेत.