‘तो’ फॉर्म्यूला कर्नाटकातही लागू व्हावा – सीताराम येचुरी
नवी दिल्ली : गोवा, मणिपूर आणि मेघालयमध्ये सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे हाच नियम कर्नाटकातही लागू व्हायला हवा असे सीपीआयचे(एम) महासचिव सीताराम येचुरी म्हणाले आहेत.
भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र रहावं असा सल्लाही त्यांनी दिला आहे. भाजप सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपालांनी गोवा, मणिपूर आणि मेघालयात सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं नव्हतं. २०१७ मध्ये गोव्यात ४० जागांपैकी १७ जागा काँग्रेसकडे होत्या. मणिपूरमध्ये ६० जागांपैकी २८ जागा काँग्रेस जिंकली, तर मेघालयातही ६० पैकी २१ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेची संधी दिली नव्हती, त्यामुळे आता याच नियमांचं पालन व्हायला हवं असं मत ट्विटरद्वारे येचुरी यांनी व्यक्त केलं आहे.