तिरुपती बालाजी मंदिरातील ७४३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
अमरावती – लॉकडाऊनमुळे बंद असलेलं तिरुपती मंदिर आता खुलं करण्यात आलं आहे. मात्र, मंदिर खुले झाल्यानंतर मंदिराच्या ७४३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, आतापर्यंत ४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतातील सर्वाधिक श्रीमंत मंदिर असलेलं तिरुपती मंदिर लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आलं होतं. भाविकांच्या आग्रहाखातर मिशन बिगेन अगेन अंतर्गत ११ जूनपासून हे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. मात्र, त्यानंतर ७४३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. तर, यापैकी ४०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३ कर्माचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
सोशल डिस्टन्सिंग आणि कोविडचे इतर नियम पाळूनच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. फक्त मंदिर प्रशासनाच्या कर्मचााऱ्यांनाच कोरोनाची लागण झाली नाही, तर संपूर्ण आंध्र प्रदेश राज्यात आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं मंदिर प्रशासनाने म्हटलं आहे. जुलैमध्ये देशभरातून २ लाख ३८ हजार भाविकांनी तिरुपती मंदिराचे दर्शन घेतल्याचं प्रशासनाने नमूद केलं आहे.