…तर मोदी विजय चौकात गळफास घेणार का?, खरगेंचे वादग्रस्त वक्तव्य
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/Clipboard01.jpg)
लोकसभा निवडणुकीचा महासंग्राम अंतिम टप्प्यात आहे. अखेरच्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होणार आहे. सातव्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी प्रचार शिगेला पोहोचला असून राजकीय नेते एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. प्रचारादरम्यान काँग्रसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ४० पेक्षा जास्त जागा जिंकल्यास मोदी दिल्लीतील विजय चौकात गळफास घेणार आहेत का? असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे. काँग्रेस पक्षाला यंदाच्या निवडणुकीत ४० जागाही जिंकता येणार नाही असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. हा दावा खोटा ठरल्यास मोदी दिल्लीतील विजय चौकात गळफास घेतील का? असे वक्तव्य खरगे यांनी कर्नाटकमधील प्रचारसभेत केले आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आहे. यावेळी काँग्रेस नेते खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. रविवारी कर्नाटकमधील चिंचोली विधानसभामधील काँग्रेसचे उमेदवार सुभाष राठोड यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत खरगे बोलत होते. ते म्हणाले की, ‘येथे उपस्थित असणारे सर्व मतदार भविष्य लिहणार आहेत. सुभाष आणि काँग्रेसचे भविष्य मोदी अथवा भाजपाच्या नव्हे तर तुमच्या हातात आहे.’
काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, ‘मोदी प्रचारासाठी जेथे जातात तेथे म्हणतात की, या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ४० जागाही जिंकता येणार नाहीत, तुमच्यापैकी कोणाला असं वाटतेय का? जर आम्हाला (काँग्रेस) ४० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मोदी दिल्लीतील विजय चौकात गळफास घेतील का? ‘ असे म्हणत खरगे यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ४४ जागांवर समाधान मानावे लागले होते.
दरम्यान, भाजपा खासदार शोभा करंदलाजे यांनी खरगे यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त करत माफी मागण्याचे अवाहन केले आहे. ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्याला असे वादग्रस्त वक्तव्य करणे शोभते का? असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.