तटरक्षक दलाने 7 खलाशांना वाचवले
अहमदाबाद – बोटीचे इंजिन बिघडल्यामुळे गुजरातच्या किनाऱ्याजवळ समुद्रामध्ये अडकून पडलेल्या 7 खलाशांना तटरक्षक दलाने सुखरूप किनाऱ्यावर आणले आहे. हे सातही खलाशी “जलारक’ नावाच्या टगबोटीतील कर्मचारी आहेत. तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने या सर्वांना पोरबंदरच्या किनाऱ्यावर आणण्यात आले. त्यांची बोट दुसऱ्या बोटीच्या मदतीने किनाऱ्यावर आणण्यात आली आहे.
काल रात्री गिर सोमनाथ जिल्ह्यतल्या वरवाला येथून जामनगर येथील सिक्का किल्ल्याकडे जात असताना त्यांच्या बोटीचे इंजिन बंद पडले होते. त्यामुळे हे सातही जण भर समुद्रातच अडकून पडले होते. त्यांच्याकडून मदतीचे आवाहन करणारा संदेश मिळाल्यानंतरही खराब हवामानामुळे त्यांच्यापर्यंत कोणतीही मदत पोहोचू शकली नव्हती. तटरक्षक दलाच्या “शूर’ हे जहाज या खलाशांच्या मदतीसाठी पाठवले गेले.
समुद्र खवळलेला असल्यामुळे “जलारक’ बोटीला किनाऱ्यापर्यंत आणता आले नाही. तटरक्षक दलाचे जहाज याच बोटीजवळ रत्रभर थांबले आणि आज पहाटेच्या दरम्यान तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरनी बोटीवरील कर्मचाऱ्यांना पोरबंदरच्या किनाऱ्यावर हलवले गेले, असे तटरक्षक दलाच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.