डोक्यावर ऊन, पोटात आग उरी संताप!
न्याय्यहक्कांसाठी कष्टकरी, श्रमिकांची मुंबईला धडक; गोंधळाविना आझाद मैदानात दाखल
पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला, डोक्यावर रणरणतं ऊन, तीन दिवसांच्या पायपिटीने पायांना आलेली सूज.. अशा अवस्थेतही उराशी असलेल्या संतापाला वाचा फोडण्यासाठी हजारो आदिवासी शेतकरी गुरुवारी मुंबईत धडकले. प्रवासात झालेली आबाळ चेहऱ्यांवर दिसत असली तरी, त्यांच्या ‘चढाई’त कुठेही बेशिस्तपणाचा लवलेशही नव्हता.
आपापल्या गावपाडय़ांतून निघालेले हे कष्टकरी तीन दिवसांची पायपीट करून बुधवारी सकाळी मुलुंड नाका येथील आनंद मैदानावर पोहोचले. तेथून पूर्व द्रुतगती मार्गावरून १९ किलोमीटरचे अंतर कापत सायंकाळी सहा वाजता हा मोर्चा चुनाभट्टी येथील वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ पोहोचला. सायंकाळी झालेल्या सभेनंतर हाती असलेल्या शिध्यात पोटाचा प्रश्न मिटवून निद्रेच्या अधीन झालेले हे आदिवासी शेतकरी दुसऱ्या दिवशी, गुरुवारी भल्या पहाटेच दक्षिण मुंबईकडे रवाना झाले.
तीन दिवसांच्या मोर्चासाठी आणलेला सर्वच शिधा जवळपास संपत आलेला. सततच्या चालण्यामुळे पायाची चाळण झालेली. पण ‘आम्ही कसत असलेली जमीन मिळालीच पाहिजे’ हा निर्धार त्यांच्या सर्व वेदनांना पुरून उरत होता. ‘३५ हून अधिक वर्षे झाली जमीन कसतोय. आमचं आयुष्य यातच गेलंय. आम्ही गाळलेल्या घामाची जमीन किमान आमच्या मुला-बाळांना तरी मिळावी’.. चाळीसगावच्या मुलताबाई सांगत होत्या.