जवानांना मिळाले मजबूत स्वदेशी सुरक्षाकवच ; ‘एके-47’ देखील ठरणार निष्प्रभ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/indian-army.jpg)
काश्मीर खोऱ्यात दहशतावद्यांशी अहोरात्र लढणाऱ्या जवानांना आता एक मजबूत सुरक्षा कवच मिळाले आहे. विशेष म्हणजे दहशतवाद्यांकडून जवानांवर हल्ला करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘एके-47’ रायफल देखील हे कवच निष्प्रभ ठरवणार आहे. कारण, स्वदेशी बनावटीचे मजबूत असे तब्बल ४० हजार बुलेटप्रुफ जॅकेट नुकतेच भारतीय सेनेच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
‘एसएमपीपी’ प्रायव्हेट लिमिटेडचे सेवानिवृत्त मेजर-जनरल अनिल ओबेरॉय यांनी याबद्दल म्हटले आहे की, आम्हाला अपेक्षा आहे की, भारतीय सेनेसाठी देण्यात आलेले बुलेटप्रुफ जॅकेटचे काम आम्ही निर्धारित वेळेच्या अगोदरच पूर्ण करू व सर्व जॅकेट सेनेकडे सुपूर्द करू. आम्हाला पहिल्या वर्षात ३६ हजार जॅकेट तयार करून द्यायचे होते, मात्र आम्ही वेळेअगोदर आहोत व त्यानुसार आम्ही सेनेकडे ४० हजार बुलेटप्रुफ जॅकेट सोपवले आहेत. सरकारकडून कंपनीला बुलेटप्रुफ जॅकेट तयार करुन देण्यासाठी २०२१ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे, मात्र आम्ही सर्व जॅकेट २०२० च्या शेवटापर्यंतच तयार करू. मागील वर्षी संरक्षण विभागाकडून एसएमपीपी या भारतीय कंपनीस तब्बल १.८ लाखांपेक्षा जास्त बुलेटप्रुफ जॅकेट तयार करण्याचे काम देण्यात आलेले आहे.