‘जय श्रीराम’ घोषणा न दिल्याने पेटवल्याचा आरोप करणाऱ्या मुस्लीम तरुणाचा मृत्यू
जय श्रीराम घोषणा देण्यास नकार दिल्याने काहीजणांनी मिळून जिवंत पेटवल्याचा आऱोप करणाऱ्या मुस्लीम तरुणाचा मृत्यू झाला आहे. १७ वर्षीय खालिदच्या कुटुंबीयांनी चौघांनी मिळून आपल्या मुलावर हल्ला केल्याचा आरोप केला होता. खालिद ६० टक्के भाजला होता. काशीमधील कबीर चौरा रुग्णालयात खालिदवर उपचार सुरु होते.
उत्तर प्रदेश पोलिसांनी मात्र खालिदचा दावा फेटाळून लावला होता. चांदौलीचे पोलीस अधीक्षक संतोषकुमार सिंह यांच्यानुसार, एका साक्षीदाराने खालिद स्वत:ला पेटवून घेत असल्याचं पाहिलं असल्याचं सांगितलं होतं. अल्पवयीन खालिदने विरोधाभास निर्माण करणारे दोन वेगवेगळे जबाब दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
अल्पवयीन खालिदने केलेल्या दाव्यानुसार, महाराजपूर गावात गेला असता तिथे चार जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला आणि फरफटत जवळच्या शेतात नेऊन पेटवून दिलं. यावेळी त्या चौघांनी जय श्रीराम घोषणा देण्यासाठी जबरदस्तीही केली. जेव्हा आपण नकार दिला तेव्हा त्यांनी मारहाण केली आणि पेटवून दिलं.
पण नंतर खालिदने त्याचा जबाब बदलत आपल्याला चौघांनी आपलं दुचाकीवरुन अपहरण करत हतीजा गावात नेलं होतं असं सांगितलं होतं. पोलिसांनुसार, महाराजपूर आणि हतीजा ही दोन्ही गावं वेगवेगळ्या टोकाला आहेत.