जम्मू-काश्मीरमध्ये चालू वर्षी 142 दहशतवाद्यांचा खातमा
जम्मू – जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. त्या मोहिमेत चालू वर्षी आतापर्यंत 142 दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला. असे असले तरी काश्मीर खोऱ्यात अजूनही 200 ते 250 दहशतवादी सक्रिय आहेत.
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) महासंचालक आर.आर.भटनागर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली. सुरक्षा दलांच्या मोहिमेमुळे दहशतवादी हवालदिल झाले आहेत. त्यातून ते नि:शस्त्र सुरक्षा जवानांना आणि त्यांच्या कुटूंबीयांना लक्ष्य करत आहेत. भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी दहशतवादी भ्याड कृत्य करत आहेत.
मात्र, जवानांच्या प्रत्येक बलिदानामुळे दहशतवाद उखडून टाकण्याचा सुरक्षा दलांचा निर्धार आणखीच बळकट बनत आहे, असे ते म्हणाले. काश्मीरमध्ये 2016-17 च्या तुलनेत कायदा आणि सुव्यवस्था स्थिती चांगली आहे. सुरक्षा जवान जखमी होण्याचे प्रमाणही घटले आहे, असे सांगतानाच त्यांनी दगडफेक, संप आदींमुळे उद्भवणारी कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या आणि दहशतवाद ही दोन मोठी आव्हाने असल्याचे मान्य केले.
युवकांना दहशतवादाचा मार्ग धरण्यापासून परावृत्त करण्यासाठी सीआरपीएफने मददगार या नावाने हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यावर वर्षभरात तब्बल अडीच लाख कॉल आले. काश्मीरमधील युवकांकडून सुरक्षा दलांमधील भरतीप्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.