जम्मूमध्ये पूराशी संबंधित घटनांमध्ये तिघांचा मृत्यू
जम्मू, जम्मू भागामध्ये अतिवृष्टीमुळे काही जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पूराशी संबंधित विविध घटनांमध्ये आतापर्यंत तिघाजणांचा मृत्यू झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अखनूर भागातील खौरच्या नातुलफल गावामध्ये पूराच्या पाण्यामध्ये एक जण वाहून गेला. पूर आलेली नदी ओलांडताना अचानक पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने हरबन्स लाल नावाचे गृहस्थ वाहून गेले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर झाड अंगावर पडून जमीला नावाची महिला मरण पावली. मुसळधार पावसामुळे किश्तवाड जिल्ह्यामध्ये कालामसाथरधर गावात एक मोठे झाड जमीलाच्या तात्पुरत्या निवाऱ्यावर कोसळले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दुर्घटनेत जमीलाची मुलगीही जखमी झाली. पूंछ जिल्ह्यामध्ये सुरनकोट येथे पूराच्या पाण्यामध्ये 22 वर्षीय अन्झर अहमद या युवकही वाहून गेला.
या मुसळधार पावसामध्ये सुमारे डझनभर कच्च्या घरांची पडझड झाली. तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मिळून 28 जनावरे मरण पावली आहेत. विशेषतः चिनाब खोऱ्यामध्ये गेल्या तीन दिवसात पावसामुळे अधिक नुकसान झाले आहे. अनेक पादचारी पूल पाण्याखाली गेले आहेत. काल रात्री तावी नदीच्या पात्रात अचानक वाढ झाल्याने सहा लोक अडकून पडले होते. त्यांना सुखरूप सोडवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रामबन, दोडा, किश्तवाड, पूंछ, राजौरी आणि रायसी जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे.