केरळमध्ये ‘निपाह’ व्हायरसचे १० बळी
कोझिकोड : केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात ‘निपाह’ व्हायरसने थैमान घातले आहे. वटवाघळाच्या संक्रमणातून पसरणाऱ्या या घातक व्हायरसमुळे आतापर्यंत दहा जणांचा बळी गेला असून, ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर २५ लोकांना या व्हायरसची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ‘निपाह’ची लागण झाल्यावर ४८ तासांत उपचार मिळाले नाही तर रुग्ण कोमात जावू शकतो. या व्हायरसचा सामना करण्यासाठी आतापर्यंत एकही लस तयार करण्यात आली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
‘निपाह’ या विषाणूमुळे झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणी डॉक्टरांचे उच्चस्तरीय पथक चौकशी करणार आहे. केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात हे पथक रवाना झाले असून, ‘निपाह’मुळे होणाऱ्या मृत्यूच्या घटनांबद्दल चौकशी केली जाणार आहे. राज्य सरकारला मदत करून आवश्यक पावले उचलण्यासाठी केंद्राचे पथक पाठविले आहे,’ असे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी जीनिव्हा येथून जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
ही आहेत ‘निपाह’ची लक्षणे
श्वास घेण्यास त्रास होणे, प्रचंड ताप, डोकेदुखी, छातीत जळजळणे, चक्कर येणे आणि बेशुद्ध पडणे आदी लक्षणे या व्हायरसची आहेत. या व्हायरसपासून बचाव करायचा असेल तर झाडांवरून जमिनीवर पडलेले फळ खाऊ नये, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.