केजरीवाल यांचा पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर घेराव घालण्याचा निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/kejari-5.jpg)
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या धरणे आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आंदोलन करत आहे. मात्र, या आंदोलनामुळे नायब राज्यपाल अनिल बैजल गेल्या चार दिवसांपासून आपल्या घरातून काम करत आहेत.
केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याला मारहाण झाली होती. याविरोधात दिल्लीतील ‘आयएएस’ अधिकाऱ्यांनी संप पुकारला आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. हा संप मागे घेण्यासाठी राज्यपाल अनिल बैजल यांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी करत केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारपासून नायब राज्यपालांच्या कार्यालयात धरणे आंदोलन सुरू केले आहे.
आम्ही गेले चार दिवस राज्यपालांच्या कार्यालयातच बसलो आहोत, मात्र चार मिनिटांचीही भेटण्याची वेळ मिळालेली नाही. पंतप्रधान मोदी यात लक्ष घालतील, अशी अपेक्षा आहे, असे आम आदमी पार्टीच्या सत्येंद्र जैन यांनी ट्विट केले. दरम्यान, आम आदमी पार्टीने नायब राज्यपाल अनिल बैजल या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थाबाहेर घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी पाच वाजता रेशनच्या घरपोच सुविधेसाठी पार्टीचे सर्व आमदार तांदळाचे एक-एक पॅकेट पंतप्रधानांना पाठविणार आहेत.