कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आमच्या सरकारकडून भरीव निधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/narendra-modi-4.jpg)
- पंतप्रधान मोदी – 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार
नवी दिल्ली – आमच्या सरकारने कृषी क्षेत्रासाठी अंदाजपत्रकात 2 लाख 12 हजार कोटी रूपयांची तरतूद केली असून सन 2022 पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा आमचा निर्धार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदींनी आज आपल्या ऍपद्वारे देशातल्या सहाशे जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारने चार मुद्द्यावर काम करण्याचे लक्ष केंद्रीत केले आहे. शेतकऱ्यांना पिक हंगामासाठी येणारा खर्च कमी करणे, त्यांच्या मालाला चांगले बाजार भाव देणे, त्यांच्या उत्पादनाची होणारी नासाडी थांबवणे आणि त्यांना पर्यायी उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध करून देणे हे आमचे लक्ष्य आहे. ते म्हणाले की मागील पाच वर्षाच्या काळात युपीए सरकारने कृषी क्षेत्रावर जितका निधी खर्च केला आहे त्याच्या दुप्पट आम्ही या क्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून दिला असून गेल्या चार वर्षात आम्ही कृषी क्षेत्रावर 2 लाख 12 हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे अशी माहिती त्यांनी दिली.
चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या मालाला दीडशे टक्के जादा हमी भाव देण्याची आम्ही घोषणा केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे कृषी क्षेत्रात चांगले उत्पादन होऊ लागले आहे असे सांगताना त्यांनी नमूद केले की केवळ अन्नधान्यच नव्हे तर दूध, भाजीपाला आणि फळांचेही चांगले उत्पादन देशात होऊ लागले आहे.
सन 2017-18 या वर्षात 280 दशलक्ष टन इतके विक्रमी अन्नधान्य उत्पादन झाल्याची माहितीही त्यांनी दिली. शेतकऱ्यांना आपल्या जमीनीचा पोत लक्षात यावा यासाठी त्यांच्या जमीनीचे सॉईल हेल्थ कार्ड आम्ही पुरवली आहेत. त्यामुळे कोणते पिक घ्यावे आणि किती खते द्यावीत याची माहिती शेतकऱ्यांना मिळू लागली आहे. देशात युरियाचाहीं मुबलक पुरवठा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.