कालपर्यंत विनवणी करणाऱ्या पाकिस्तानने आज केली ‘दगाबाजी’
श्रीनगर : पाकिस्तानने आपल्या खोटारड्या स्वभावाप्रमाणे आज दगा दिला आहे. रविवारी भारताकडे गोळीबार थांबवण्याची विनंती करणाऱ्या पाकिस्तानने सोमवारी सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू-काश्मीरच्या अर्णिया सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी भारतीय चौक्यांवर तोफगोळयांचा मारा केला.
भारतानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. सकाळी सात वाजल्यापासून पाकिस्तानने अर्णिया सेक्टरमध्ये गोळीबार सुरु केला आहे. पाकिस्तानने सीमारेषेवरील गावांना लक्ष्य केले असून पाकिस्तानकडून गोळीबार आणि तोफांचा मारा सुरु आहे. पाकिस्तानने अचानक केलेल्या या हल्ल्यामध्ये अनेक गावकरी अडकून पडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु होते. भारताने पाकिस्तानच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केल्यानंतर पाक रेंजर्सने फोन करून बीएसएफला गोळीबार बंद करून शांतता राखण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, आज पुन्हा पाकिस्तानी रेंजर्सनी दगाबाजी करत हल्ला केला.