एकाच वेळी पाच पेक्षा अधिक संदेश पाठवण्यास बंदी घालणार
- व्हॉट्स ऍपचा निर्णय
नवी दिल्ली – मुले पळवणाऱ्या टोळीच्या संबंधात अफवा पसरवणारे संदेश भारतात एकाचवेळी अनेक ठिकाणी पाठवण्यात आल्याचा प्रकार घडल्याने अशा अफवा पसरवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी व्हॉट्स ऍपने एकाच वेळी पाच पेक्षा अधिक संदेश पाठवण्यावर निर्बंध घालायचे ठरवले आहे.
या कंपनीने म्हटले आहे की भारतातील व्हॉट्स ऍप वापरणारे लोक एकाचवेळी अनेक लोकांना संदेश, फोटो, व्हिडीओ पाठवत असतात. जगातील अन्य लोकांच्या तुलनेत भारतातील लोकांचे हे प्रमाण अधिक आहे.त्यामुळे अशा प्रकारचे निर्बंध घालण्याचा विचार आम्ही करीत आहोत.
व्हॉट्सऍपचे जगभरात एक अब्ज पेक्षा अधिक ग्राहक आहेत त्यापैकी जवळपास 20 कोटी ऍप धारक भारतातच आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्याप्रमाणात संदेश पसरवणाऱ्यावर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही हे निर्बंध घालणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे. व्हॉट्स ऍप द्वारे मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जात असल्याचे उघड झाल्याने भारत सरकारनेही या कंपनीला नोटीस पाठवली आहे. व्हॉट्सऍप द्वारे खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे त्यावर नियंत्रण आणण्याची सूचना भारत सरकारने त्यांना पाठवलेल्या दुसऱ्या नोटीशीत केली आहे.