इंडोनेशिया : भूकंप-त्सुनामीतील मृतांचा आकडा 2,000 जवळ तर 5,000 पेक्षा अधिक बेपत्ता
जकार्ता – इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटाला 28 सप्टेंबर रोजी जोरदार भूकंपाचा हादरा बसला. त्यानंतर जोरदार त्सुनामीही आली. 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीनं इंडोनेशियाचं जनजीवन अक्षरशः कोलमडून गेलं आहे. भूकंप आणि त्सुनामीच्या या नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणात जिवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले. मृंताचा आकडा हा 2,000 च्या जवळ पोहचला आहे. तसेच अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत.
सोमवारी इंडोनेशियातील सरकारी अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण हजारों लोक अजूनही बेपत्ता आहेत. स्थानिक सैन्य प्रवक्ता एम.थोहिर याने सांगितले की, सुलावेसी बेटावर दुहेरी आलेल्या आपत्तीत मृतांचा आकडा 1,994 वर पोहोचला आहे. भूंकप आणि त्सुनामीमुळे पालू शहरातील उपनगरे पुर्णपणे उदवस्त झाली आहेत.
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, 28 सप्टेंबरच्या भूंकप आणि त्सुनामीमुळे प्रभावित झालेल्या दोन ठिकाणाहून जवळजवळ 5000 लोक बेपत्ता आहेत यावरून अंदाज लावला असता सध्याच्या मृतांच्या संख्येपेक्षा आणखी मृतांची संख्या वाढू शकते.
आपत्ती व्यवस्थापन 11 आॅक्टोबर पर्यंत बेपत्ता लोकांचा शोध घेणार आहेत. तोपर्यंत ज्याचा शोध लागणार नाही त्यांना मृत समजून बेपत्ता म्हणून सूचीबध्द केले जाईल.
सरकारचे म्हणणे आहे की, पालू शहरात अनेक मृतदेह गाळाखाली अडकले गेले आहेत, त्याचठिकाणी त्या मृतदेहांना दफन केले जाईल.