आत्महत्येच्या प्रयत्नात आई घाबरली, मुलींना बुडण्यासाठी सोडून स्वत:ला वाचवलं
संकटकाळात आई-वडिल मुलांचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा करत नाहीत. पण मध्य प्रदेशच्या बेतुल जिल्ह्यात एका महिलेने बिलकुल या उलट केले. तिने मुलांच्या जिवाची फिकीर न करता स्वत:चे प्राण वाचवले. घरात भांडण झाल्यामुळे या महिलेने दोन मुलींना सोबत घेऊन विहीरीत उडी मारली. पाण्यात पडल्यानंतर ती महिला घाबरली. तिने मुलींना पाण्यातच सोडले व स्वत: बाहेर आली.
शनिवारी रात्री १० च्या सुमारास आमला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लालबाडी गावात ही घटना घडली. रविवारी सकाळी दोन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. नवऱ्यासोबत भांडण झाल्यामुळे महिलेने शेजाऱ्यांच्या विहीरीत उडी मारली. विहीरीत पाणी भरलेले होते व बऱ्यापैकी खोल होती. जीवन संपवण्यासाठी म्हणून तिने विहीरीत उडी मारली होती. विहीरीत उडी मारताना मुली तिच्या हातातून निसटल्या. पाण्यात पडल्यानंतर ती महिला घाबरली.
कसेबसे त्या महिलेने तिथे असलेली दोरी पकडली व बाहेर आली. दुर्देवाने मुलीचा बुडून मृत्यू झाला. आमला पोलीस स्टेशनचे प्रमुख एसएस मुक्ती यांनी ही माहिती दिली. तपास पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. लग्न झाल्यापासून आमच्यात सतत भांडणे सुरु आहेत असे पतीने पोलिसांना सांगितले.