अमेरिका-पाकिस्तान संबंध अगदी टोकाच्या अवस्थेला गेलेत – परवेझ मुशर्रफ
इस्लामाबाद (पाकिस्तान) – अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अगदी टोकाच्या अवस्थेला पोहचल्याचे वक्तव्य पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी केले आहे. पाकिस्तानच्या विरोधात जाऊन अमेरिका भारताशी जवळीक वाढवत असल्याचा आरोप करताना त्यांनी म्हटले आहे, की अमेरिका आपल्या गरजेपुरताच पाकिस्तानचा वापर करीत आली आहे.
जेव्हा अमेरिकेला इस्लामाबादची गरज नसते, तेव्हा ती पाकिस्तानला धोका देते असेही त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. पाकिस्तान-अमेरिका संबंधात अनेक चढउतार आलेले असून सध्या हे संबंध अगदी टोकाच्या-नाजूक अवस्थेला पोहचले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आपल्या कारकिर्दीत भारत-पाकिस्तान संबंध शांती आणि समझोत्याच्या मार्गावर गेले असल्याचा उल्लेख करताना त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंह यांची प्रशंसा केली आहे. आपण शांतीसाठी एक चार सूत्री कार्यक्रम आखला होता. त्यात सियाचीन आणि काश्मीर या मुद्यांचाही समावेश होता असे त्यांनी म्हटले आहे. अटल् बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंह हे दोन्ही नेते जरी दोन वेगवेगळ्या पक्षांचे असले, तरी ते दोघेही संघर्ष टाळून पुढे जाणारे होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याप्रमाणे शांतीची वकिली करत नाहीत असा तक्रारीचा सूर त्यांनी लावला आहे.
देशद्रोहाचा आरोप असलेले परवेझ मुशर्रफ गेल्या वर्षापासून दुबईत राहत आहेत. डॉक्टरी उपचारांसाठी त्यांना पाकिस्तान सोडण्यची परवानगी देण्यात आली होती.