‘अब की बार ३०० पार’, नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास
काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि कछपासून ते कामरुपपर्यंत प्रत्येकजण ‘अब की बार ३०० के पार, फिर एक बार मोदी सरकार’ म्हणत आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. यावेळची निवडणूक गेल्या सर्व निवडणुकींपेक्षा वेगळी आहे कारण लोक यावेळी देशासाठी मतदान करत आहेत, कोणा एखाद्या पक्षासाठी नाही असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. नवा भारत निर्माण करण्यासाठी मतदान होत आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘सत्तेत आल्यानंतर १० दिवसांत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल असं आश्वासन काँग्रेसने दिलं होतं. पण खरंच कर्जमाफी झाली का ? आता तर बँका नवं कर्ज देण्यासही नकार देत आहेत. ज्यांनी कर्जमाफी केलेली नाही त्यांना सांगा’, असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं.
‘तुम्हाला वीज देण्याचं आश्वासन देत त्यांनी खिल्ली उडवली आहे. त्यांचं आश्वासन ऐकल्यानंतर तज्ञही बुचकळ्यात पडले आहेत. त्यांनी वीजदर कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण डोकं तर पहा त्यांनी वीज पुरवठात अर्ध्यावर आणला’, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला.
मध्य प्रदेशात सातव्या टप्प्यात आठ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील १३ , पश्चिम बंगालमधील नऊ, बिहारमधील आठ, हिमाचल प्रदेशातील चार आणि झारखंडमधील तीन जागांवर मतदान होणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार असून निकाल हाती येईल.