अपहरण केलेल्या हिंदू मुलींना कुटुंबाकडे सोपवा, सुषमा स्वराज यांची पाकिस्तानकडे मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Sushma-Swaraj-4.jpg)
केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अपहरण करण्यात आलेल्या दोन अल्पवीयन हिंदू मुलींना कुटुंबाकडे सोपवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात होळीच्या दिवशी या मुलींचं अपहरण करुन जबरदस्तीने धर्मांतरण करत लग्न लावून देण्यात आलं. सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानकडे मागणी करत टीकाही केली आहे.
‘पाकिस्तानात हिंदू मुलींचं जबरदस्ती धर्मांतर : रवीना फक्त 13 वर्षांची असून रिना 15 वर्षांची आहे. नव्या पाकिस्तानचे पंतप्रधानही यावर विश्वास ठेवणार नाहीत की इतक्या छोट्या वयात या मुली स्वत: धर्मांतर कऱण्याचा आणि लग्नाचा निर्णय घेतील’, असं सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. न्याय देत दोन्ही मुलींना तात्काळ त्यांच्या कुटुंबांकडे सोपवलं पाहिजे अशी मागणी सुषमा स्वराज यांनी केली आहे.
दरम्यान हिंदू मुलींचे अपहरण व धर्मांतर करून त्यांचा निकाह लावण्यात आल्या प्रकरणी पाकिस्तानचे माहितीमंत्री फवाद चौधरी व भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली होती. स्वराज यांनी या घटनेबाबत भारताचे पाकिस्तानातील दूत अजय बिसारिया यांच्याकडे माहितीवजा अहवाल मागितल्यानंतर पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी हा पाकिस्तानचा हा अंतर्गत मामला असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दोन मुलींचे अपहरण करून धर्मांतर व नंतर निकाह लावल्याच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
स्वराज यांनी हिंदू मुलींवर ओढवलेल्या प्रसंगाबाबत माहिती मागवल्यानंतर पाकिस्तानचे माहितीमंत्री फवाद चौधरी यांनी उत्तरादाखल असे म्हटले होते, की दोन मुलींच्या धर्मांतराचे प्रकरण हा आमचा अंतर्गत मामला आहे. मोदींच्या भारतात अल्पसंख्याकांना वाईट वागणूक दिली जात असताना आमच्याकडे मात्र अल्पसंख्याकांना सन्मानाने वागवले जाते. आमच्या ध्वजातील पांढरा रंग हा आम्हाला प्रिय असून तो अल्पसंख्यकांचे प्रतिनिधीत्व करणारा आहे. भारतातील अल्पसंख्यकांच्या प्रश्नावर तुमचे वर्तनही असेच राहील, अशी आमची अपेक्षा आहे.
त्यावर स्वराज यांनी म्हटले आहे, की दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे धर्मांतर करून विवाह लावल्याच्या प्रकरणात राजदूतांकडे अहवाल मागितला आहे. त्यावर तुम्ही अशी प्रतिक्रिया देत असाल, तर त्यातून तुमची अपराधित्वाची भावना व झालेली चिडचिड दिसून येते.
सिंध प्रांतातील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांचा एका धर्मगुरूने विवाह लावल्याचे चित्रफितीतून स्पष्ट झाले आहे. त्यात या मुलींनी स्वेच्छेने इस्लाम धर्म स्वीकारल्याचे वदवून घेण्यात आले. त्यामुळे येथील हिंदू समुदायाने निदर्शने करून हा गुन्हा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. माहितीमंत्री फवाद चौधरी यांनी ट्विटरवर असे म्हटले होते, की पंतप्रधान इम्रान खान यांनी सिंधच्या मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करण्यास सांगितले आहे. या मुलींना पंजाब प्रांतातील रहिम यार खान येथे नेण्यात आले. पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्यकांवर नेहमीच अत्याचार होत असल्याचा मुद्दा भारताने वेळोवेळी मांडला आहे.