अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत 27 मृत्यूमुखी
पाटणा- अपघातानंतर बसला लागलेल्या आगीमध्ये 27 प्रवासी होरपळून मृत्यूमुखी पडल्याची घटना आज बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथे घडली. मुझफ्फरपूरवरून दिल्लीला जाणारी बस राष्ट्रीय महामार्ग क्र. 28 वर बेलवा गावाजवळ उलटली. या अपघातानंतर बसला आग लागून त्यामध्ये 27 प्रवासी होरपळले, अशी माहिती बिहारचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री दिनेशचंद्र यादव यांनी दिली. या आगीमधून केवळ चौघाजणांना जिवंत वाचवणे शक्य झाले. या चारही जखमी प्रवाशांना उपचारांसाठी सदर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
ही बस खासगी प्रवास कंपनीची होती आणि एका दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न चालकाने केला होता. त्या प्रयत्नामध्ये बस रस्त्यावरून खाली उतरली आणि उलटली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यापूर्वीच बसला आग लागली, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बसमध्ये 32 प्रवासी होते. हे सर्वजण मुझफ्फरपूरचे रहिवासी होते. या परिसरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने मदत कार्यामध्ये अडथळे आले होते.