अखिलेश यांचे हात दंगलीतील रक्ताने माखलेले…
- मुख्यमंत्री योगी यांची टीका
कैराना – कैराने लोकसभा मतदार संघातील पोट निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असून आज तेथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी असा आरोप केला की समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे हात मुज्जफरनगर येथील दंगलीच्या रक्ताने माखले आहेत. त्यामुळेच अखिलेश यांचे येथे येऊन प्रचार करण्याचे धाडस होत नाही असे ते म्हणाले.
ते सहारणपुर जिल्ह्यातील अंभेता येथील प्रचार सभेत बोलत होते. मुज्जफरनगर जिल्ह्यात सन 2013 साली हिंदु-मुस्लिम दंगली झाल्या होत्या व त्यात अनेक मुस्लिम मारले गेल्याने मुस्लिमांनी येथून मोठ्या प्रमाणात पलायन केले होते. त्यावेळी अखिलेश यांचेच सरकार राज्यात सत्तेवर होते. त्यांच्या काळात विशिष्ट समाजातील युवकांनाच रोजगार मिळत होते अन्य युवकांना बेरोजगार िंहंडावे लागत होते असा आरोप त्यांनी केला. कैराना मतदार संघासाठी येत्या 28 मे रोजी मतदान होत आहे. तेथे भाजपने याच मतदार संघातील भाजपचे दिवंगत खासदार हुकुमसिंह यांच्या कन्या मृगांका यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. विरोधकांवर टिका करताना ते म्हणाले की निवडणूक आल्या की ते एकत्र येतात. एरवी त्यांना विकास किंवा चांगल्या प्रशासनाशी काही देणेघेणे नसते.
आजही या भागातील वातावरण चांगले नाही. येथून अनेक जणांना आजही पळून जाणे भाग पाडले जात आहे. समाजवादी पक्षाच्या गुंडांकडून हे काम सुरू आहे असे ते म्हणाले. या राज्यातील राजकारणाला केवळ जातीयवाद आणि परिवार वादाचे ग्रहण लागले होते पण आता या राज्याचे राजकारण शेतकरी, व्यापारी अणि युवकांच्या विकासाभोवती फिरते आहे असे ते म्हणाले.