आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारचा कामांचा धडाका
Loksabha Eelction : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होणार असल्यामुळे सरकारने दोन दिवसांत सुमारे २६९ शासन निर्णय जारी केले आहेत. यामध्ये पदस्थापना, जलप्रकल्प, रस्ते, कोकणातील कामे आणि निधींची पूर्तता अशा शासकीय निर्णयांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकाआधी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आचारसंहितेपूर्वी शासन निर्णय जारी करून कामे आटपण्याची निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. याचमुळे सरकारने भूमिपूजन आणि उद्घाटनांचा धडाका लावला आहे. दुसरीकडे शासनाने राज्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन दिवसात तब्बल २६९ शासन निर्णय घेतले आहे. यांसदर्भात मंत्रिमंडळाची बैठक होऊन हे निर्णय जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – ‘आज मी तुमच्यासमोर बारामतीचा उमेदवार जाहीर करतोय’; शरद पवारांची मोठी घोषणा!
आचारसंहिता लागल्यानंतर सर्व शासकीय कामांना ब्रेक लागतो. त्यामुळे सरकारकडून ६ आणि ७ मार्च अशा दोन दिवसांत जवळजवळ २६९ जीआर जारी करण्यात आले. ७ मार्चला तर एका दिवसात तब्बल १७३ जीआर जारी करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने निधी वितरणाचे जीआर आहेत. यासोबत राज्य उत्पादन शुल्कसारख्या महत्त्वाच्या विभागातील उप अधीक्षक व अधीक्षकांच्या पदस्थापनेचेही निर्णय जारी केले आहेत. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यातील काही योजनांना मान्यताही देण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचा जम्मू-काश्मीरचा पाहणी दौरा झाल्यानंतर १४ किंवा १५ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने इतर राज्यांचा निवडणूकपूर्व आढावा घेतला असून सोमवार ते बुधवार तीनही निवडणूक आयुक्त जम्मू विभाग तसेच काश्मीर खोऱ्याला भेट देणार आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकींची घोषणा होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या घोषणांकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं असताना दुसरीकडे निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. निवणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडेच आयोगाचा पदभार असणार आहे.